वसंत पंचमी
Wikipedia कडून
वसंत पंचमी ॥
माघ शुद्ध पंचमीला वसंत पंचमी म्हणतात. वसंताचा उत्सव हा निसर्गाचा उत्सव आहे. तो ह्या दिवसापासून सुरू होतो. सतत सुंदर भासणारा निसर्ग वसंत ऋतूत सोळा कलांनी फुलून उठतो. यौवन हा जर आपल्या जीवनातील वसंत असेल तर वसंत हे सृष्टीचे यौवन आहे. महर्षी वाल्मिकींनी रामायणात वसन्त ऋतूचे अतिशय सुन्दर व मनोहारी चित्रण केले आहे. भगवान श्रीकृष्णानेही गीतेत `ऋतूनां कुसुमाकरः' असे म्हणून ऋतुराज वसन्ताची बिरुदावली गाइली आहे. कविश्वर जयदेव तर वसन्त ऋतूचे वर्णन करता करता थकलाच नाही.
सतत आकर्षक वाटणारा निसर्ग वसन्त ऋतूमध्ये लोभस बनतो. स्वतःच्या आगळ्या सौंदर्याने तो माणसाला स्वतःकडे ओढून घेतो. मात्र माणसाने त्याचे अवलोकन करण्याची फुरसत काढली पाहिजे.
मानवाने स्वतःच्या अस्वस्थ प्रकृतीला स्वस्थ बनवण्यासाठी निसर्गाच्या सान्निध्यात गेले पाहिजे. निसर्ग एक असा अजब जादू आहे की\, जो मानवाला त्याच्या सर्व वेदनांचे तत्काळ पुरेसे विस्मरण करवितो. जर ह्या निसर्गाचे सान्निध्य सतत राहिले तर त्याचा मानव जीवनावर फारच खोल प्रभाव पडतो व त्याचा परिणाम चिरगामी ठरतो.
निसर्गात अहंशून्यता असते आणि म्हणूनच तो प्रभूच्या अधिक जवळ आहे. याच कारणामुळे निसर्गाच्या सान्निध्यात गेल्यावर आपण प्रभूच्या अधिक जवळ गेलो आहोत असा अनुभव येतो.
निसर्ग सुख\-दुःखाच्या द्वंद्वापासून दूर आहे. वसन्त असो अथवा वर्षा\, वेगवेगळ्या रूपात प्रभूचा हात सृष्टीवर फिरत असतो आणि समग्र निसर्ग प्रभूस्पर्श प्राप्त करून फुलून उठतो. जीवनातही जर प्रभूचा स्पर्श झाला\, प्रभूचा हात फिरला तर संपूर्ण जीवनच बदलून जाईल. जीवनात वसन्त फुलून उठेल. जीवनातून दुःख\, दैन्य\, दारिद्र्य क्षणभरात दूर होईल.
प्रभुस्पर्शी जीवनात नेहमी एकच ऋतू असतो आणि तो म्हणजे वसन्त! त्याच्या जीवनात एकच अवस्था कायम राहाते आणि ती म्हणजे यौवन!
परंतु निसर्गाची सुन्दरता व मानवाची रसिकता ह्यांच्यात जर प्रभूचा सूर मिळाला नाही तर ही सुन्दरता व रसिकता विलासाचा मृदुल पंथ निर्माण करून मानवाला विनाशाच्या गर्तेतदेखील ढकलून देईल. म्हणूनच वसन्ताच्या संगीतांत गीतेचा सूर मिसळला पाहिजे.
वसंताचा उत्सव हे अमर आशावादाचे प्रतीक आहे. वसंताचा खरा पुजारी जीवनात कधी निराश बनत नाही. शिशिर ऋतूत वृक्षाची पाने गळून पडतात\, पण तो स्वतःच्या जीवनातून निराशा झटकून टाकतो.
वसंत म्हणजे आशा व सिद्धी ह्यांचा सुन्दर संगम. कल्पना व वास्तवता ह्यांचा सुगम समन्वय. खर्žया महापुरुषाच्या जीवनात आशेला सिद्धीमध्ये बदलवणार्žया साधनांचे फारच महत्व असते. तो केवळ कल्पनात रमणारा स्वप्नशील असत नाही. तसाच रोजच्या वास्तविक जीवनापासून जरादेखील वर पाहू नये इतका जडही असत नाही.
जीवन व वसंत ज्याने एकरूप करून टाकले अशा मानवाला आपली संस्कृती संत म्हणते. ज्याच्या जीवनात वसंत फुलतो तो संत!
यौवन आणि संयम\, आशा आणि सिद्धी\, कल्पना आणि वास्तव्य\, जीवन आणि कवन\, भक्ती व शक्ति\, सर्जन व विसर्जन ह्या सर्वांचा समन्वय साधणारा तसेच जीवनात सौंदर्य\, संगीत व स्नेह प्रकट करणारा वसंत आपल्या जीवनात साकार बनला तरच आपण वसन्ताच्या वैभवाला जाणले\, अनुभवले व पचवले असे म्हणता येईल.
- साभार:
पांडुरंगशास्त्री आठवले